Monday 23 July 2012

सनातनी विचारांच्या विषाची जाणीवपूर्वक पेरणी

गेल्या शनिवारी 'खेळ मनाचा' प्रसिद्ध झाला. मोबाईल खणखणू लागला. या जादूटोणाविरोधी बिलात तर विरोध करण्यासारखं काही नाही. तरी याला विरोध का? असे प्रश्न मला विचारले जाऊ लागले. पुण्याच्या एका कीर्तनकारांनी (ते तोपर्यंत बिलाला सक्रिय विरोध करत होते. फोनवर माझ्याशी दीर्घकाळ चर्चा केली. त्यांच्याजवळ बिलाची प्रत होतीच. त्यातील प्रत्येक मुद्याबाबत बारीकसारीक शंका काढून पूर्ण शंकानिरसन करून घेतलं. नंतर ते मला म्हणाले, ''मानव, तुम्ही छान समजावून सांगितलं. या बिलात विरोध करण्यासारखं काहीही नाही. उलट ते समाजहिताचं आहे. तुम्ही पुढाकार घेऊन सगळ्यांचं शंकानिरसन केलं पाहिजे म्हणजे सगळ्यांचा विरोध मावळेल.''

त्यांचा विरोध प्रामाणिक होता म्हणून त्यांचं समाधान झालं. मला खात्री आहे की, थोडीशीही समाजाविषयी कणव असणारा प्रत्येक प्रामाणिक माणूस या बिलाचं समर्थनच करेल. मग विरोध का? सनातन संस्थेच्या गोबेल्स, गणित, खोटय़ा प्रचाराविषयी मी मागच्या लेखात लिहिलं आहेच. त्यांच्या आक्रमक खोटय़ा प्रचाराला अनेक सरळ धर्मप्रेमी माणसं बळी पडतात आणि काही आपलं राजकारण सिद्ध करण्यासाठी वेड पांघरूण पेडगावला जातात.

आळंदीच्या एका मोठय़ा कीर्तनकारांचे खूप फोन यायचे. मला ते खूप शिव्या घालायचे. आवाजावरनं ते वयस्क कीर्तनकार आहेत हे माझ्या लक्षात आल्यामुळं एरवी कुणाचीही धमकी मुळीच ऐकून न घेणारा मी शांतपणे त्यांचं बांलणं ऐकत असे. शांतपणे त्यांचं शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करत असे. ''तू हिंदूची औलाद नाही. मुसलमानाची औलाद आहे.'' अशी सुरुवात करणारे ते कीर्तनकार नंतर बरेच शांत होत असत. आळंदीला जाऊन मी त्यांच्यासोबतच चर्चा केली. बिलात काय आहे ते समजावून सांगितले. त्याची प्रत त्यांना दिली. त्यांचा एकच आग्रह मुसलमान.. मुसलमान.. मुसलमान. ते जे बोलत होते ते मी लिहिणं शक्य नाही. कुठलाही 'माणूस' त्याचा उच्चारही करू शकत नाही. म्हणून त्यांचे नाव जाहीर लिहीत नाही. शेवटी मी त्यांना म्हणलो, ''मी वारकरी संप्रदायाला खूप मानतो. तीन पिढय़ांपासून माझं घर वारकर्‍यांचं घर आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज या संतपरंपरेचं धर्मातील अंधश्रद्घा दूर करण्याचं मोलाचं काम करण्यासाठीच मी अ. भा. अंनिसची स्थापना केली. गेली 30 वर्षे ते काम करतो आहे. फक्त कीर्तन माध्यमाचा वापर न करता भाषण माध्यमाचा वापर करतो आहे. मी तुम्हांला, वारकर्‍यांना बापासारखा समजतो. आपला समजतो. म्हणून माझ्यावतीनं मी खूप तळमळीनं तुम्हांला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण जोवर या देशात मुसलमान आहेत तोवर एकही समस्या सुटू शकत नाही. तोवर कोणताही बदल, सुधारणा करता कामा नये असंच तुमचं मत असेल तर आधी या देशातील 22 कोटी मुसलमान मारून टाका. मगच आपण धर्मसुधारणा - अंधश्रद्घा निर्मूलन या विषयासंबंधी बोलू..''

माणसाला सहिष्णुता शिकवणार्‍या वारकरी संप्रदायाचा एखादा समुदाय एवढय़ा विषारी विचारांचा असू शकतो यावर माझा विश्वासच बसेना. पण हे सनातनी विचारांचं विष पेरण्याचं काम गेली अनेक वर्षे सुरू आहे आणि त्यांच्या हाती 'ब्रेन वॉशिंग'सारखं प्रभावी, आधुनिक हत्यार आलं आहे. यासंबंधी नंतर विस्तारानं लिहीनच. पण या बिलासंबंधी मुद्दाम गैरसमज पसरविण्याचं राजकीय कौशल्य कुणाचं? मला पहिल्यांदाच जाहीररीत्या सांगून टाकलं पाहिजे, की भारतीय जनता पक्षाचा या बिलाला संपूर्ण पाठिंबा होता. आजही असलाच पाहिजे. त्यांना विरोध करण्याचा नैतिक अधिकारच नाही. त्या वेळचे भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष नितीन गडकरी माझे जुने मित्र. विद्यार्थिदशेपासूनचे स्नेही. मी दै. 'तरुण भारत' (नागपूर) चा 'युवा स्तंभ' चालवत असे. त्या वेळी ते विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. तेव्हापासूनची मैत्री. त्यांनी माझं काम एकदम सोपं करून टाकलं. जादूटोणाविरोधी बिलासंबंधी सारे निर्णय घेण्यासाठी भाजपतर्फे अशोक मोडक या आमदारांना प्रतिनिधी नेमून टाकलं. विधिमंडळाच्या भाजप कार्यालयात मा.गोपीनाथ मुंडे, विरोधी पक्षनेते पांडुरंगजी फुंडकर यांच्यासमोर नितीन गडकरींनी माझ्यासमक्ष विषय काढला आणि चारही प्रमुख नेत्यांनी अशोक मोडक म्हणतील तर भाजपचं अंतिम मत असेल, असं एक मतानं सांगितलं.

मा. अशोक मोडक अतिशय आग्रही. पण खूप प्रगल्भ विचारांचे असल्यामुळं आमचं काम फारच सोपं झालं. एका महत्त्वाच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील, सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या उपस्थितीत अशोक मोडक यांनी या बिलावर अंतिम शिक्कामोर्तब केलं. त्यांनी सुचवलेले सारे बदल मान्य केले. मोडकांच्या आग्रहाखातर बिलात सार्वजनिक चळवळींना महत्त्वाचं स्थान देणारी एक तरतूद होती. तीही आम्ही काढून टाकली. त्यामुळं या बिलाला विरोध करण्याचा कोणताही नैतिक अधिकार भाजपला नाही. माझे स्नेही नितीन गडकरी नेहमी म्हणतात, ''मी दिलेला शब्द कधीही मोडत नाही.'' आता तर ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळं त्यांचा शब्द, त्यांच्या पक्षाचा अधिकृत शब्द खरा करण्याची जबाबदारी ते पार पाडतील याची मला खात्री आहे. 2005 सालच्या हिवाळी अधिवेशनाआधी झालेल्या याच महत्त्वाच्या बैठकीच्या वेळी भाजपचे आ. मंगलप्रसाद लोढा यांच्या नेतृत्वाखाली जैन धर्मीयांचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटायला आलं. खरं म्हणजे ते हे बिल मंजूर करू नका असं सांगण्यासाठी आले होते. मुख्यमंर्त्यांनी त्यांच्याशी मला चर्चा करायला सांगितली. सुरुवातीस आ. लोढा माझ्याशी बोलण्यास तयारच होईना. सनातन्यांनी त्यांना एवढं भडकवलं होतं, की ते मला बहुधा राक्षस (मानव नाहीच) समजत असावेत. सारं बिल शिष्टमंडळानं समजावून घेतल्यावर आ. मंगलप्रसाद लोढा म्हणाले, ''मानव, हे तर फारच चांगलं बिल झालं आहे. यात विरोध करण्यासारखं काहीच नाही. उगाच गैरसमज पसरविला जातो आहे. आम्ही धार्मिक माणसांचा गैरसमज दूर करण्यासाठीच या बिलात काही तरी टाका. चांगल्या धार्मिक रूढी-परंपरांना हे बिल लागू पडत नाही असं काहीतरी..'' मी त्यांना मुख्यमंर्त्यांना सांगायला सांगितलं. ''आपल्याला असं काही टाकता आलं तर टाका,'' असं मुख्यमंत्री म्हणाले. म्हणून आम्ही (मी, तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे, पी. एस. मिलिंद शंभरकर) त्या पद्धतीनं एक वाक्य तयार केलं. कायदा खात्याच्या माणसांना ते दिलं. 'या बिलात व्यक्तीचं शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान न करणार्‍या कोणत्याही चांगल्या रूढी-परंपरेचा समावेश नाही' अशी तळटीप टाकायचं आम्ही ठरवलं होतं. कायदा खात्यानं त्यांचं 13 वं कलम करून टाकलं. त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्याचं शब्दांकन तयार केलं. ते समजायला कठीण आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. पण वेळ नव्हता. नागपूर अधिवेशनात बिल मांडायचं असल्यामुळे आणि बिलाचं अंतिम रूप तयार करण्याची जबाबदारी व अधिकार कायदा खात्याचाच असल्यामुळं आम्ही गप्प बसलो.

2005 साली 26 डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात, विधानसभेत, बहुमतानं हे जादूटोणाविरोधी बिल संमत झालं. त्यावर काही भाषणं झाली. त्यात आ. देवेंद्र फडणवीस यांचंही भाषण झालं. आणीबाणी काळातील व

माझ्या नागपूर वास्तव्यातील आमचे एक जिंदादिल स्नेही गंगाधर फडणवीस यांचा तडफदार

मुलगा म्हणून देवेंद्र फडणवीस हा आम्हा सगळ्यांचा कौतुकाचा व औत्सुक्याचा विषय. पुढच्या

मुंबई अधिवेशनात त्यांनी या 13व्या कलमाकडे माझं लक्ष वेधून घेतलं. ते वकीलही आहेत. मी ते 13 वं कलम खूप गांभीर्यानं घेतलं.

काय आहे 'ते' कलम?

13. शंका दूर करण्यासाठी याद्वारे उसे घोषित करण्यात येते की, ज्यामुळे व्यक्तीला मानसिक, शारीरिक वा आर्थिक बाधा पोहोचत नाही असे कोणतेही धार्मिक विधी व धार्मिक कृत्ये अंतर्भूत असलेल्या कृतींना या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.

याचा खरा अर्थ असा होतो की, परिशिष्टातील 12 कलमात एखादी रूढी, विधी, कृत्य येत असेल (कारण या 12व्या कलमाव्यतिरिक्त इतर कशालाच हे बिल लागू होत नाही असं व्याख्येत 2 (ख), स्पष्टच केलं आहे) आणि त्याद्वारे व्यक्तीला मानसिक, शारीरिक, आर्थिक बाधा पोहोचत नसेल तर त्यालाही हे बिल लागू होणार नाही. ती गोष्ट शिक्षापात्र ठरणार नाही.

चांगल्या रूढी-परंपरांना हे बिल लागू होत नाही हे सांगण्यासाठी हे 13 वं कलम समाविष्ट केलं आहे. त्याचा अर्थ हाच होता. फार गदारोळ व्हायला लागल्यानंतर मी पुन्हा सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांच्याकडे गेलो. कायदा खात्याच्या शब्दरचनेनुसार टाकलेलं हे 13वं कलम त्यांनी बारकाईनं पाहिलं आणि निर्वाळा दिला. ''भाषा उगीच क्लिष्ट केली आहे. न्यायमूर्तीनी अगदी सुरुवातीलाच मला समजावून सांगितलं होतं. बिलाची भाषा सोपी हवी. कुणालाही कळली पाहिजे. बिल मराठीतच तयार करायचं. मग त्याचं इंग्रजीत भाषांतर करायचं. नाहीतर इंग्रजीत बिल बनवतात. मग क्लिष्ट मराठीत त्याचं भाषांतर करतात ते योग्य नाही. त्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानला तयार केलेले कायदे वाचा.'' एवढय़ावर ते त्या वेळी थांबले नाहीत, तर अनेक तास माझ्यासोबत बसून त्यांनी या बिलातील महत्त्वाची कलमं सोप्या मराठी भाषेत तयार करून दिली होती. त्यामुळं या वेळी क्लिष्ट भाषेविषयी (13व्या कलमाच्या) त्यांनी नापसंती व्यक्त केली.

पण पुढे म्हणाले, ''पण अर्थ बरोबर आहे. व्यक्तीचं मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान न करणार्‍या रूढी-परंपरांना (विधी, कृत्ये) यातून सूट दिली आहे. त्या शिक्षापात्र ठरणार नाही असाच याचा अर्थ निघतो. व्यक्तीचं मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान करणार्‍या धार्मिक, विधी, कृत्यांना हे बिल लागू होतं असा अर्थ निघूच शकत नाही. कुणालाही तो काढता येणार नाही. कायद्याचा उलटा अर्थ काढता येत नसतो.'' सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पी. बी. सावंतांनी हा निर्वाळा दिल्यावर मी रिलॅक्स झालो. ना.चंद्रकांत हांडोरेही रिलॅक्स झाले. पण मग ''उद्या आम्ही, आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा केली तर तुम्ही म्हणाल व्यक्तीचं आर्थिक नुकसान झालं. आम्हांला 6 महिने जेलमध्ये पाठवालं. पंढरपूरच्या वारीला पायी गेलो तर म्हणाल, शारीरिक नुकसान झालं. आम्हांला 6 महिने जेलमध्ये पाठवालं. आम्ही घरी देवाची 2 तास पूजा करत असलो तर म्हणालं तुमचं मानसिक नुकसान झालं. 6 महिने जेलमध्ये पाठवाल.'' असं कोण म्हणालं? का म्हणालं? वृत्तपत्रात मोठमोठे मथळे बातम्या छापून आल्यानं. असं बिलात कुठेही नसतानाही सनातन्यांच्या खांद्याला खांदा लावून या बिलाच्या विरुद्ध असा गोबेल्सप्रणीत खोटा प्रचार करण्याची सुपारी कुणी घेतली आहे? का घेतली असावी? पाहू पुढच्या शनिवारी.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्घा निर्मूलन

समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी : 9371014832

No comments:

Post a Comment